मुंबई – प्रतिनिधी,महाराष्ट्रातील सर्व साहित्यिक, शाहीर, कवी, लेखक, गीतकार, संगीतकार, प्रबोधनकार तसेच सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष तथा हिंदू मातंग सेना मुख्य प्रवक्ते कार्यकारी प्रमुख युवराज दाखले यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.
मातंग समाजाच्या इतिहासामध्ये अनेक संत, महापुरुष, क्रांतिकारक, समाजप्रबोधन करणारे विचारवंत आणि शौर्यगाथा निर्माण करणारे व्यक्तिमत्त्वे होऊन गेले आहेत.
त्या इतिहासाला अनुसरूनच शाहिरी, गीते, कविता व साहित्य निर्मिती व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजाच्या इतिहासाशी विसंगत किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे तयार होणारी गीते, शाहिरी किंवा कथन यामुळे समाजामध्ये चुकीचा संदेश जातो व अज्ञानातून अनेक व्यक्ती त्या गोष्टींनाच खरा इतिहास समजू लागतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
माननीय श्री युवराज दाखले म्हणाले की, साहित्य आणि शाहिरी ही समाज परिवर्तनाची प्रभावी साधने आहेत.
त्यामुळे मातंग समाजाच्या बाबतीत लिहिताना इतिहासातील संदर्भ, संत परंपरा, सामाजिक संघर्ष, सांस्कृतिक योगदान आणि महापुरुषांचे कार्य यांचा अभ्यास करूनच साहित्य निर्मिती व्हावी. इतिहास वेगळा असताना केवळ मनोरंजन किंवा प्रसिद्धीसाठी चुकीचे उल्लेख होणे समाजासाठी घातक ठरू शकते.
मातंग समाजाने देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि स्वातंत्र्य चळवळीत दिलेले योगदान मोठे आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील शाहिरांनी, गीतकारांनी व लेखकांनी सत्य इतिहास जनतेसमोर आणण्याची जबाबदारी स्वीकारावी, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच भविष्यात मातंग समाजाच्या इतिहासाचा सन्मान राखणारे, समाजाला प्रेरणा देणारे आणि ऐतिहासिक सत्य मांडणारे साहित्य निर्माण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ




















