-
हजारो नागरिकांचा सहभाग अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करणारी प्रेरणादायी दौड..
- पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२६ :-साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या व आमदार अमित गोरखे यूथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘साहित्यरत्न दौड २०२६’ ला आज चिंचवड येथील बर्ड व्हॅली उद्यान चौकातून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. पिंपरी-चिंचवडसह विविध शहरांतील हजारो नागरिकांनी या दौडीत उत्स्फूर्त सहभाग घेत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन केले.
- लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक या दौडीत सहभागी झाले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक समतेच्या, परिवर्तनाच्या आणि शिक्षणाच्या विचारांचा जागर करत उत्साह, जल्लोष आणि सकारात्मक ऊर्जेच्या वातावरणात दौडीला सुरुवात झाली. संपूर्ण परिसर घोषणांनी आणि सहभागी नागरिकांच्या उत्साहाने दुमदुमून गेला.
- यावेळी आमदार शंकर जगताप, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, माजी महापौर योगेश बहल, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे सभापती कैलास कुटे, ब प्रभाग अध्यक्ष मंदार देशपांडे,नगरसदस्य शत्रुघ्न बापू काटे,शितल शिंदे, तुषार हिंगे,कुशाग्र कदम, धर्मपाल तंतरपाळे,अनिल घोलप,नगरसदस्य अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, सुजाता पलांडे, उमेश चांदगुडे, उप आयुक्त अण्णा बोदडे,पंकज पाटील,शिवसेना उपनेते इरफान सय्यद, तसेच नेताजी शिंदे, गणेश लंगोटे, वैशाली खाडे, धरम वाघमारे, मंगेश घाडगे, अनिता वाळुंजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
- “साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांनी समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा विचार समाजासमोर मांडला. त्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘साहित्यरत्न दौड’ हे प्रभावी माध्यम ठरत आहे. ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून सामाजिक बांधिलकी, एकात्मता आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा लोकसहभागाचा उपक्रम आहे. युवकांनी निरोगी जीवनशैली स्वीकारत समाज परिवर्तनाच्या विचारांशी जोडले जावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.”
- आमदार अमित गोरखे
-
दौडीच्या निमित्ताने अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला अभिवादन करत सामाजिक ऐक्य, निरोगी जीवनशैली आणि युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. सहभागी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा प्रेरणादायी कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.

✍🏻मुख्य संपादक – लहू राम अडसूळ





















